नशिराबादमध्ये मध्यरात्री दुचाकी जाळण्याची घटना ; परिसरात चिंता
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | शहरातील पेठ परिसरात मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी दुचाकी जाळल्याची घटना उघडकीस आली असून त्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना ९ मार्च रोजी घडली असून पेठ परिसरातील रहिवासी सिताराम बुधा नाथ यांच्या मालकीची दुचाकी अज्ञातांनी पेटवून दिल्याचे समोर आले आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत या भागात दुचाकी जाळण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वीही पेठ परिसरातील ज्ञानेश्वर नाथ, नारायण धनगर यांच्या दुचाकीला आग लावण्यात आली होती. त्या प्रकरणाचा तपास सुरू असून या नव्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
दोन्ही घटनांमध्ये नुकसान झालेल्या व्यक्ती हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कष्टाने घेतलेल्या दुचाकींना आग लावण्यात आल्याने संबंधित कुटुंबांवर आर्थिक परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे परिसरात रात्रीच्या सुरक्षेबाबत अधिक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे. विशेषतः रात्रीची पोलिस गस्त वाढविणे तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू असल्याचे समजते.


