मनुदेवी, यावल येथे २७ मार्चला जळगाव जिल्हास्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन !
मंदिर सरकारीकरण, मंदिरांच्या भूमी बळकावणे, वक्फ बोर्डचे अतिक्रमण, वस्रसंहिता आदी विषयांवर चर्चा!
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आपल्या राजे-महाराजांनी मंदिरांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरांचे संरक्षण केले, तसेच आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचे जीर्णोद्धार केले. आज मात्र भारताने ‘सेक्युलर’ वादी राज्यव्यवस्था स्वीकारल्यामुळे केवळ मंदिरांचे सरकारीकरण आणि त्या मंदिरांचा भ्रष्टाचार, पैसे घेऊन ‘व्ही.आय.पी.’ दर्शन, मंदिरांची भूमी बळकावणे, ‘वक्फ बोर्ड’चे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण चालू आहे. अशा वेळी मंदिर संस्कृतीचे रक्षण करणे हे हिंदु समाजाचे दायित्व आहे.
एकूणच मंदिरांच्या समस्यांचे निवारण करणे, मंदिरात येणार्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, दर्शनरांगांचे सुनियोजन करणे, तसेच मंदिर परंपरांचे रक्षण करणे यांसाठी मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, भक्त आदींचे संघटन आवश्यक आहे. त्यासाठी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ मार्च या दिवशी जळगाव जिल्हा स्तरीय‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन’चे आयोजन करण्यात आले आहे.
या अधिवेशनाला संपूर्ण जिल्हा भरातून १५० हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट, पुणे येथील निवृत्त सह धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख यांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
फेब्रुवारी २०२३ जळगाव येथे पहिल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर ओझर, पुणे येथे दुसरी परिषद झाली. त्यानंतर महासंघाचे कार्य उत्तरोत्तर वाढत असून दोन वर्षांच्या आत ते संपूर्ण राज्यभर पोचले आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून राज्यात ८०० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. तर १५ हजारांहून अधिक मंदिरांचे संपूर्ण देशभरात संघटन झाले आहे.
या अधिवेशनाला जळगाव शहरातील ग्रामदैवत श्रीराम मंदिर, एरंडोल येथील पद्मालय देवस्थान, पारोळा येथील बालाजी मंदिर, अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर, श्री कण्व मुनी आश्रम, श्री नागाई - जोगाई मंदिर, अवचित मारुती मंदिर आदी विविध पुरातन, प्रसिद्ध मंदिरातील विश्वस्त तसेच जिल्ह्यातील १३ तालुक्यातील मंदिरे सहभागी होणार आहेत. या मंदिर अधिवेशनात मान्यवरांचे मार्गदर्शन, मंदिरांशी निगडीत विविध विषयांवर परिसंवाद होणार आहेत. यामध्ये ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’, ‘मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे’, ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या परिसरात मद्य-मांस बंदी आदी विषयांवर चर्चा होणार आहे. ही परिषद केवळ निमंत्रितांसाठी असून यामध्ये सहभागी होण्यासाठी 9552426439 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर महासंघाने केले आहे.