मोठी बातमी! PNG गॅसधारकांना LPG गॅस सोडावा लागणार, आता फक्त एकच गॅस कनेक्शन
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने घरगुती गॅस कनेक्शनसंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. त्यामुळे, आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम नागरिकांच्या घरातील किचनवर झाल्याचं दिसून येत आहे.
देशातील वाढत्या गॅस (Gas) टंचाईवर सरकारने भूमिका मांडली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की,घरगुती गॅसधारकांसाठी कुठलाही तुडवटा नाही. मात्र, केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकिंगचा कालावधी वाढवला असून व्यवसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठाही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे, सरकार गॅसटंचाई नाही असे सांगत असले तरीही गॅसटंचाई गावागावात जाणवत आहे. त्यातच, केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आता पीएनजी (PNG) गॅस कनेक्शन असलेल्यांना एलपीजी (LPG) गॅस कनेक्शन सोडावे लागणार आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने घरगुती गॅस कनेक्शनसंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, ज्या लोकांकडे पाईपने गॅस पुरवठा होतो, त्या नागरिकांना आता एलपीजी गॅस कनेक्शन सोडावे लागणार आहे. त्यामुळे, पीएनजी कनेक्शन वापरकर्त्या ग्राहकांना एलपीजी गॅस कनेक्शन तात्काळ सरकारकडे जमा करावे लागेल.
ज्यांच्याकडे PNG कनेक्शन आहे, ते सरकारी तेल कंपन्यांच्या डिस्ट्रीब्यूटर्सकडून LPG सिलेंडरसाठी पुरवठा प्राप्त करू शकणार नाहीत. असं केंद्रीय मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. घरगुती गॅसच्या उत्तम नियोजन आणि वाटपासाठी घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पीएनजी आणि एलपीजी गॅस कनेक्शन एकत्र ठेवल्याने गॅस पुरवठ्यामध्ये असमानता, काळाबाजार आणि संस्थाच्या अनावश्यक दुहेरी वापराची अडचण निर्माण होते. त्यामुळेच, ग्राहकांना एकाच गॅस कनेक्शनद्वारे घरगुती गॅसचा पुरवठा केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आलं आहे. ज्यांच्या घरी पहिल्यापासून पीएनजी गॅस कनेक्शन म्हणजेच पाईपद्वारे गॅस पुरवठा होत आहे, त्यांच्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.
पीएनजी गॅस कनेक्शनधारकांची संख्या मेट्रो शहर आणि महानगरांमध्ये मोठी आहे, त्यामुळे केंद्राच्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणातील ग्राहकांना आपले एलपीजी गॅस कनेक्शन सोडावे लागणार आहे.इराण इस्त्राईल अमेरिका युद्धाच्या झळा जगभराला बसत आहेत.त्यामुळे सर्वत्र इंधन व गॅस टंचाई भासू लागली आहे.भारतात गॅस टंचाई प्रकर्षाने जाणवू लागलेली असल्याने शासनाने व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे, अनेक भागात व्यवसायिक गॅस सिलेंडरची काळाबाजारी सुरू झाली आहे.


