S T संपाचा तिढा सुटला,उच्च न्यायालयाने दिले ” या ” तारखेला कामावर रुजू होण्याचे आदेश
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या सहा महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या कर्मचारी संपाचा तिढा अखेर सुटला असून २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच सगळ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा अशी कृती करणार नाही असा इशारा देऊन सेवेत सामावून घ्यावे असे आदेश एसटी महामंडळाला दिले आहेत. तर या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटीचा लाभ देण्याबाबत आदेश देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
तसेच न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या शक्य त्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु ज्या कर्मचाऱ्यांवर संपादरम्यान गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेणार नाही अशी भूमिका यावेळी महामंडळाने मांडली आहे. मात्र ते मागे घेण्याबाबत आम्ही आदेश देऊ असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आम्हाला या संपामुळे एकही मृत्यू झालेला नको आहे. सिंह आणि कोकरूच्या वादात आम्हाला कोकरूला वाचवावे लागेल असे न्यायालयाने यावेळी सांगितले आहे. तर न्यायालयाने कर्मचाऱ्यांना कोविडचा भत्ता देण्यासही सांगितले असल्याची माहिती संपकरी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. एका कर्मचाऱ्याला ३०० रुपये प्रमाणे प्रत्येकी ३० हजार देण्यास सांगितले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान याआधी बुधवारी झालेल्या सुनावणीत सध्याच्या कसोटीच्या काळात आपले उपजीविकेचे साधन गमावू नका आणि जनतेला त्रास होऊ देऊ नका, असे आवाहन करत न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांना १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची सूचना केली होती. संपकऱ्यांना एक संधी देऊन त्यांच्यावरील कारवाईच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याबरोबरच त्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्या, अशी सूचनाही न्यायालयाने महामंडळाला केली होती.