थोरगव्हाण–भुसावळ रस्त्यावरील पुलाचे काम अपूर्ण, उघड्या गिट्टीमुळे अपघातांची मालिका सुरू
थोरगव्हाण, ता.रावेर.मंडे टु मंडे न्युज, प्रा. संतोष राणे सर |थोरगव्हाण येथून भुसावळकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावरील पाटावरील पुलाचे काम अनेक महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या एंट्री पॉईंटवर मोठ्या प्रमाणावर गिट्टी व खडी उघडी पडलेली असून, कोणतेही सूचक फलक, बॅरिकेड्स अथवा सुरक्षिततेची व्यवस्था न केल्यामुळे दुचाकीस्वारांचे वाहन घसरून अपघात होत आहेत. ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) गंभीर निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
मंगळवारी याच ठिकाणी एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा दुचाकी अपघात झाला. गाडी स्लीप झाल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने, इतर वाहनधारकांनी वेळीच मदत करून त्यांना भुसावळ येथील रुग्णालयात दाखल केले, अन्यथा मोठी प्राणहानी झाली असती.
थोरगव्हाण–भुसावळ हा रस्ता शॉर्टकट व कमी रहदारीचा असल्यामुळे थोरगव्हाणसह सावदा परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर या रस्त्याचा वापर करतात. मात्र पुलाचे काम अर्धवट ठेवून रस्त्यावर उघडी खडी व गिट्टी टाकणे म्हणजे वाहनधारकांचा जीव धोक्यात घालण्यासारखे असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे.
सार्वजनिक रस्त्यावर काम अपूर्ण ठेवून कोणतीही सुरक्षा व्यवस्था न करणे हे नियमबाह्य असून, यामुळे भविष्यात एखादा गंभीर अपघात होऊन जीवितहानी झाल्यास यास जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
तरी संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कंत्राटदार व स्थानिक प्रशासन यांनी तातडीने दखल घेऊन पुलाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करावे, रस्त्यावरील उघडी गिट्टी हटवावी व सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


