आम्ही “त्यांनाच” मारलं “ज्यांनी” निरपराध लोकांचे “बळी” घेतले, आम्ही मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं
दिल्ली. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून “आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी निरपराध लोकांचे बळी घेतले, भारताच्या संरक्षण दलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत प्रथमच
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय लष्कराने देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. असही राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.
“आम्ही मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी निरपराध लोकांचे बळी घेतले होते, असं विधान आज सहा राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५० बीआरओ यांच्या पायाभरणीच्या योजनेच्या उद्घाटन प्रसंगी राजनाथ सिंह यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, तुम्हाला माहितीच असेल की, काल रात्री भारताच्या सशस्त्र सैन्य दलांनी आपलं शौर्य आणि पराक्रमाचा परिचय देताना एक नवा इतिहास लिहिला आहे. भारतीय लष्कराने अचुकता, सतर्कता आणि संवेदशीलतेचा परिचय देत लक्ष्य उद्ध्वस्त केलं. भारतीय लष्कराने कुठल्याही रहिवासी भागाला लक्ष्य केलं नाही.
ऑपरेशन सिंधूरसाठी मी आमच्या सैन्यदलातील जवान आणि अधिकाऱ्यांना संपूर्ण देशाच्यावतीने धन्यवाद देतो. तसेच लष्कराला संपूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानतो. आम्ही ही कारवाई करताना ‘जिन मोहि मारा, तिन मोहि मारे’ या मारुतीरायाच्या आदर्शाचं पालन केलं. आम्ही केवळ आमच्या निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्यांनाच मारले, असे शेवटी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.