कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या १० गाईंची सुटका, रावेर पोलिसांची कारवाई
रावेर, मंडे टु मंडे न्युज | गोहत्या बंदी असताना सुद्धा गाईंची, गोवंश जातीच्या गुरांची कत्तलीसाठी वाहतूक होत असते. रावेर यावल अशी अनेक प्रकरणे घडत असताना रावेर तालुक्यात पुन्हा कत्तलीच्या उद्देशाने पिकअप वाहनातून वाहून नेत असलेल्या १० गाईंची रावेर पोलिसांनी सुटका केली.
रावेर तालुक्यातील पाडला बुद्रुक ते मौजे अहिरवाडी दरम्यान एका पिकअप वाहनावर रावेर पोलिसांनी कारवाई करत वाहनातून कत्तलीसाठी नेणाऱ्या १० गाईंची सुटका केली. यात वाहनावरील चालक व क्लिनर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.
रावेर पोलिसाना गाई मध्यप्रदेश राज्यातून महाराष्ट्र राज्यात कत्तलीच्या उद्देशाने आणत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहिती वरून सापडा रचत रविवार दि. ६ एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास मौजे पाडला बुद्रुक ते मौजे अहिरवाडी दरम्यान रस्त्यावर पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमपी ०४ एफयु ६२१७ या वाहनाला अडविले असता वाहनाचा चालक व क्लिनर अंधाराचा फायदा घेत बाजूच्या शेतात पळून गेले. त्याती तिसरा अनोळखी इसम अशांना ताब्यात घेऊन सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात १० गोवंश जातीच्या गाई निर्दयतेने दोरीने बांधून अवैधरीत्या वाहतूक करताना दिसून आल्या.
या १० गाई ताब्यात घेत एकूण ३ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्या १० गाईंना खानापूर येथील चंद्रकलाबाई गोटीवाले, गोशाळा येथे औषधोपचार व संवर्धनासाठी दाखल करण्यात आले आहेत.
रायसिंग उर्फ भाया रामसिंग अजनारे (रा. लालमाती ता. रावेर), त्याचा चालक आकाश शांताराम आवले उर्फ बारेला व अनोळखी इसम अशा तिघांवर कत्तल करण्याच्या उद्देशाने १० गाई निर्दयतेने घेऊन जात असल्याच्या कारणावरून पोलीस शिपाई श्रीकांत शिरीष चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई हि पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि तुषार पाटील, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, श्रीकांत चव्हाण, चालक संजीव मेढे यांनी केली आहे.