“पैसे दिल्या शिवाय काम होत नाही” तरी ही काम करीत नाही, विहिरी व बेघरांना घरकुल मंजुरीसाठी पैसे खाणाऱ्यांना सोडणार नाही…
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सरकार कडून शासकीय योजने मार्फत शेतकऱ्यांना विहिरी व बेघरांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. त्या नुसार चाळीसगाव तालुक्यात शेतकऱ्यांना हजारोंच्या विहिरी व बेघरांना घरकुल मंजूर केले होते. मात्र पंचायत समिती मधील रोहयो विभागातील एपीओ, टिपीओ, ज्यू इंजिनिअर व वरिष्ठ अधिकारी यांनी परस्पर मंजुरीच्या व जिओ टॅगच्या नावाने प्रत्येक शेतकऱ्यांकडून २० ते २५ हजार रुपये लाच घेऊन आपली पोटे भरली. प्रत्येकी सुमारे २० ते २५ हजार रुपये लाच घेऊनही बिले काढली जात नाहीत. या संदर्भात तक्रारी आ.मंगेश चव्हाण यांच्याकडे येत होत्या.
एव्हडे पैसे देऊनही शेतकऱ्यांच्या विहिरींचे व घरकुलांचे बिल निघत नसल्याने अखेर सोमवारी २८ रोजी आ. मंगेश चव्हाण शेतकऱ्यांसह पंचायत समिती कार्यालय गाठत गटविकास अधिकारी व संबंधितांची कानउघाडणी केली. गोरगरीब शेतकऱ्यांकडून पैसे लुबाडण्याचे हे पंचायत समिती मध्ये सिंडिकेट असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला आहे. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. या मुळे पंचायत समितीची प्रतिमा मलिन झाली असल्याचे आ. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांसह आ. मंगेश चव्हाण यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत पंचायत समिती मधील संबंधित भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात रीतसर तक्रार दिली आहे. चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना व घरकुल धारकांना आ.मंगेश चव्हाण यांनी आवाहन केले आहे. की ज्यांच्याकडून विहिरी व घरकुल मंजुरीसाठी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांनी पैसे घेऊन फसवणूक केली असेल त्यांनी पुढील दोन दिवसात तक्रार देण्यासाठी माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तालुक्यातील सर्व तक्रारदार शेतकऱ्यांना घेऊन संबंधित अधिकारी – कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असेही आ. मंगेश चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे