सावदा – फैजपूर शहराला जोडणारा धाडी नदी वरील पूल मोजतोयं शेवटच्या घटका … केव्हा उजळेल पुलाचे भाग्य?
भानुदास भारंबे सावदा/फैजपूर. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l फैजपूर – सावदा या दोन मोठ्या शहरांना जोडणारा हा फैजपूर जवळील धाडी नदीवरील पूल याची आजची परिस्थिती पाहता ह्या पुलाची हलत अत्यंत बिकट झाली असून हा पूल कधीही कोसळू शकतो. रस्त्यावर असलेले खड्डे व तुटलेले कठडे पुलाच्या सुरक्षा कठड्यांपासून तर पूलाच्या उभ्या ढाच्याकडे आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की हा कधीही कोसळू शकतो. केव्हाही कधीही कोसळू शकणारा या पुलाची आताची परिस्थिती साक्ष देत आहे. मात्र याकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही का? की हा पूल कोसळून मोठी दुर्दैवी घटना घडण्याची वाट पाहिली जात आहे का? असाही मोठा प्रश्न पडतो.
नुकताच दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाळे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदी वरील जुना पूल कोसळून अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ताजी घटना आहे.

डोळे असून आंधळेपणाचा आव?
या धाडी नदीवरील पुलाला जवळ जवळ ५० वर्ष झालेली असतानाही या पुलाची कधीतरी फक्त किरकोळ डागडुगी केली जाते. डागडुजी म्हणजे थातूरमातूर खड्डे बुजले जातात. परंतु “म्हाताऱ्या माणसांला नवीन अवयव जरी बसविले तरी शेवटी तो म्हाताराच राहतो” असला प्रकार या पुलाचा आहे.
जिल्ह्यातील सर्व जबाबदार शासकीय नीम शासकीय अधिकारी, मंत्री, तसेच सत्ताधारी,सत्ताविरोधी राजकारणी या पुलावरून प्रवास करतात मात्र नेमकं इथून प्रवास करत असताना त्यांची गाडी हवेतून जाते की काय? असा प्रश्न उभा राहतो.
पूल सध्या धोकादायक बनला आहे.पुलावरून दररोज लहान मोठे हजारो वाहने ये जा करीत असतात.या पुलाचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.अनेक वेळा या पुलाची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. हा पूल अंकलेश्वर – बऱ्हाणपूर राज्य महामार्गावर असल्याने शेकडो वजनाचे अनेक जड वाहने येथून दररोज जात असतात.
सर्वसामान्य नागरिक तसेच कष्टकरी श्रमिक, महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थिनी पायी व वाहनांवर असा हजारो वाहनांचा ताफा या पुला वरून दिवसा – रात्री जात असताना अनेक वेळा अनेक किरकोळ दुर्घटना या ठिकाणी झाल्या आहेत पण केवळ राजकारण करणाऱ्यां ना या प्रश्नांविषयी कुठलीही जाण नाही का? किंवा ते या विषयी काहीच का बोलत नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र राज्यात अशा दुर्दैवी दुर्घटना घडत असताना या पुलाचे भाग्य आता तरी उजळेल का?
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा