यावल तालुक्यातील कासवे गावातील पाण्याची पाईप लाईन फुटली ; दूषित पाणी पिण्याची वेळ, ग्रामस्थ संतप्त
पाडळसा,ता. यावल. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील कासवे गावातील पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईप लाईन गटारीखाली फुटल्याने गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. गटारीतील घाण पाणी थेट पाईप लाईनमध्ये मिसळत असल्याने पाण्याची गुणवत्ता पूर्णतः बिघडली असून, त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या समस्येबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दूषित पाणी प्यावे लागत असल्याने काही नागरिकांना उलट्या, जुलाब यांसारखे आरोग्यविषयक त्रास सुरू झाले आहेत. गावात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
आरोग्याचा गंभीर प्रश्न
गटारीतून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे पाईप लाईनमधील पाणी दूषित होत असल्याने गॅस्ट्रो, डायरिया, टायफॉईडसारख्या आजारांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे गावातील लहान मुले, वृद्ध आणि गरोदर महिलांची विशेषतः अधिक धोक्यात आहेत.
ग्रामस्थांची मागणी
ग्रामस्थांनी तात्काळ पाईप लाईनची दुरुस्ती करावी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामपंचायत कडून दुर्लक्ष
ग्रामपंचायतीकडून वारंवार आश्वासने दिली जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीविरुद्ध तीव्र निषेध आंदोलन करण्यात येण्याची शक्यता आहे.