सावदा शहराचे गॅस वितरण ‘शहरी’ वर्गीकरणात करून ४५ दिवसांची जाचक अट कमी करावी– गटनेत्या रंजना भारंबे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
सावदा, मंडेटू मंडे न्युज नेटवर्क : एकीकडे सावदा शहराचा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि नागरिकांच्या गरजा दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे गॅस सिलिंडरसाठी शहरातील नागरिकांना गॅस सिलिंडर मिळण्यासाठी तब्बल ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गॅस वितरणातील हा विसंगत प्रकार थांबवून या पार्श्वभूमीवर सावदा शहराचा ‘ग्रामीण’ वर्गीकरणातून ‘शहरी’ वर्गात समावेश करून गॅस वितरणाचा कालावधी ४५ दिवसावरून २५ दिवसांचा करावा, अशी ठोस मागणी सावदा नगरपरिषदेच्या गटनेता तथा नगरसेविका सौ. रंजना जितेंद्र भारंबे यांनी विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन यांचे शिफारस पत्र जोडत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पूर्वी गॅस टंचाईच्या काळात सावदा शहराचा गॅस वितरणासाठी ‘ग्रामीण’ क्षेत्रात समावेश करण्यात आला होता. मात्र, काळ बदलला, शहराची लोकसंख्या वाढली, नागरीकरण झाले; तरीही गॅस वितरणाच्या बाबतीत सावद्यावर आजही ‘ग्रामीण’चा शिक्का कायम आहे. परिणामी, एका सिलिंडरनंतर दुसरा सिलिंडर मिळण्यासाठी नागरिकांना ४५ दिवस अर्थात दीड महिना प्रतीक्षा करावी लागत असून हा कालावधी सर्वसामान्य कुटुंबासाठी अत्यंत अन्यायकारक व चूल पेटवणे कठीण करणारा ठरत आहे.
फैजपूरला २५ दिवस, मग सावद्यालाच ४५ दिवस का?
सावद्याच्या अगदी शेजारी असलेल्या फैजपूर शहराचा ‘शहरी’ भागात समावेश असल्याने तेथील नागरिकांना अवघ्या २५ दिवसांत गॅस सिलिंडर उपलब्ध होतो. लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती आणि नागरिकांच्या गरजांच्या दृष्टीने दोन्ही शहरांमध्ये फारसा फरक नसताना गॅस वितरणाच्या बाबतीत सावद्यालाच ४५ दिवसांची प्रतीक्षा का, सावदेकरावरच हा दुजाभाव का ? असातीव्र असंतोष नागरिकामध्ये आहे.
‘ग्रामीण’चा शिक्का हटवा; सावद्याला न्याय द्या!
वाढती लोकसंख्या आणि गॅसची वाढती मागणी लक्षात घेता सध्याची ४५ दिवसांची प्रतीक्षा नागरिकांसाठी विशेषतः महिलांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत असून अत्यंत त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे सावदा शहराचा गॅस वितरण व्यवस्थेतील ‘ग्रामीण’ वर्गीकरणाचास ‘शहरी’ वर्गात समावेश करावा, तसेच नागरिकांना २५ दिवसांच्या कालावधीत गॅस सिलिंडर मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी गटनेता तथा नगरसेविका सौ. रंजना जितेंद्र भारंबे यांनी विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन यांचे शिफारस पत्र जोडत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या निवेदनावर शहरातील १०२ नागरिकाच्या सह्या आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

