“धागा शौर्याचा,राखी अभिमानाची” जे. ई.स्कूलच्या विद्यार्थिनींनी सैनिक बांधवांसाठी पाठवल्या राखी आणि शुभेच्छा पत्रे!
मुक्ताईनगर.मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके | रक्षाबंधनाच्या या पवित्र सणाचे औचित्य साधून येथील जे. ई. स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील शिक्षक एस आर ठाकूर आणि विद्यार्थिनींनी “धागा शौर्याचा,राखी अभिमानाची”असा कौतुकास्पद उपक्रम राबविला.
विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या आणि शुभेच्छा पत्र तयार करून ती १८ महाराष्ट्र बटालियन, जळगाव येथील सैनिक बांधव, कर्नल,मेजर आणि पदाधिकाऱ्यांसाठी पाठविल्या आहेत.
सीमेवर आणि विविध भागात अहोरात्र सेवा बजावणाऱ्या सैनिक बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक एस. आर. ठाकूर हे गेल्या १० वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवत आहेत.त्यांनी विद्यार्थिनींना या उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांना राख्या व पत्रे तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले. या आवाहनाला प्रतिसाद देत जवजवळ १०० विद्यार्थिनींनी अत्यंत उत्साहाने स्वतः राख्या तयार करून सैनिक बांधवांना शुभेच्छा दिल्या.या सर्व राख्या आणि शुभेच्छा पत्रे विद्यालयाचे एनसीसी ऑफिसर मनोज चौधरी यांच्यामार्फत जळगाव येथील १८ महाराष्ट्र बटालियनकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एम. चौधरी उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थिनींच्या या सामाजिक भावनेचे आणि उपक्रमाचे विशेष कौतुक केले. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल आदरभाव असणे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले.प्रसंगी कार्यक्रमाला उपप्राचार्य व्ही. के. शिर्के मॅडम, पर्यवेक्षक व्ही. डी. बऱ्हाटे, के. आर. कवळे, एस. एम. वाढे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


