येत्या शैक्षणिक वर्षात चार वर्गांचा अभ्यासक्रम बदलणार
पुणे.मंडे टु मंडे न्युज | राज्यातील पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२७-२८पासून नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात करण्यात येणाऱ्या या बदलासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीने पाठ्यपुस्तक निर्मितीची प्रक्रिया सुरू केली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा-शालेय शिक्षण २०२३ आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा-शालेय शिक्षण २०२४ यांच्या आधारे राज्यातील तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके सर्व वर्गांना एकाच वेळी लागू न करता टप्प्याटप्प्याने अंमलात आणली जात आहेत.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पहिलीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला. त्यानंतर २०२६-२७ मध्ये दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन पाठ्यपुस्तके लागू करण्यात आली. आता पुढील टप्प्यात २०२७-२८ पासून पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे.
या चारही वर्गांच्या अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. पाचवी, सातवी आणि नववीच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानंतर अकरावीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीला सुरुवात केली जाणार आहे. अभ्यासक्रम आणि पुस्तकांचे मसुदे अंतिम झाल्यानंतर छपाईची प्रक्रिया सुरू होईल.
यंदा दुसरी, तिसरी आणि चौथीच्या पाठ्यपुस्तकांच्या मसुद्याला सुकाणू समितीची मान्यता मिळण्यास विलंब झाला होता. त्याचा परिणाम पुस्तकनिर्मितीच्या नियोजनावर झाला. ही बाब लक्षात घेऊन पुढील वर्षीची नियोजित पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच उपलब्ध व्हावीत, यासाठी आतापासूनच तयारी करण्यात येत असल्याचे बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी सांगितले.
नवीन पाठ्यपुस्तकांचे त्रयस्थ संस्थेकडून मूल्यमापन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत आतापर्यंत पाच वर्गांसाठी नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके लागू करण्यात आली आहेत. या नवीन पुस्तकांचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर नेमका काय परिणाम झाला, याचे स्वतंत्र मूल्यमापन करण्याचा प्रस्ताव आहे.
हे मूल्यमापन त्रयस्थ संस्थेमार्फत करण्याचे नियोजन असून, त्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी प्रत्यक्ष संवाद साधला जाणार आहे. विविध घटकांचे अनुभव आणि अभिप्राय जाणून घेत पाठ्यपुस्तकांची उपयुक्तता आणि परिणामकारकता तपासली जाणार आहे.
याबाबत बालभारतीच्या संचालक मंडळात चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.
शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून एकूण ४ प्रमुख इयत्तांचा (वर्गांचा) अभ्यासक्रम बदलणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP) नुसार, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) तर्फे टप्प्याटप्प्याने हा बदल केला जात आहे.शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मध्ये खालील ४ विशिष्ट वर्गांचा अभ्यासक्रम बदलणार असून विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके दिली जातील
:इयत्ता ५ वी (Class 5)इयत्ता ७ वी (Class 7)इयत्ता ९ वी (Class 9)इयत्ता ११ वी (Class 11)टप्प्याटप्प्याने होणाऱ्या बदलांचे वेळापत्रक (Phased Rollout)
महाराष्ट्र राज्य मंडळाने (State Board) एकाच वेळी सर्व वर्गांचा अभ्यासक्रम न बदलता खालीलप्रमाणे नियोजन केले आहे:
२०२५-२६ – इयत्ता १ ली … लागू झाला आहे.
२०२६-२७- इयत्ता २ री, ३ री, ४ थी आणि ६ वी ….नवीन पुस्तके लागू करण्यात आली आहेत.
२०२७-२८ – इयत्ता ५ वी, ७ वी, ९ वी आणि ११ वी…. पुढील टप्प्यात बदल होणार (काम सुरू आहे).
२०२८-२९ – इयत्ता ८ वी, १० वी आणि १२ वी ….अंतिम टप्प्यात बदल होईल.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

