नशिराबाद : कुंभार वाड्याजवळील विहिरीचे बांधकाम रखडले; सांडपाण्याचा निचरा थेट विहिरीत, अपघाताचा धोका वाढला
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | येथील कुंभार वाड्याजवळ मुख्य जलकुंभाशेजारी सुरू असलेले विहिरीचे बांधकाम गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत रखडले असून, सध्या या विहिरीच्या बाजूला वाहत असलेल्या गटारीचे सांडपाणी झिरपत आहे. असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीच्या शेजारीच मुख्य जलकुंभ असल्याने पाण्याच्या स्त्रोताच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. अपूर्ण बांधकामामुळे बाजूच्या गटारीतील दूषित पाणी थेट विहिरीत मिसळत असून, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक महिन्यांपासून ही परिस्थिती कायम असतानाही संबंधित विभागाने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही.
दरम्यान, या बांधकामस्थळी कोणत्याही प्रकारचे इशारा फलक किंवा सुरक्षेची व्यवस्था करण्यात आलेली नाही. बांधकामासाठी वापरलेल्या लोखंडी सळयांची जाळी व उघड्या सळया चे अपूर्ण बांधकाम असल्याने त्यावर जर खेळतांना लहान मुले चढली तर त्यांचा पाय त्यात अडकून मोठा अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही.त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः हा रस्ता रामदेव बाबा मंदिर, न्यू इंग्लिश स्कूल, द्वारका नगर आणि श्रीकृष्ण नगर या भागांना जोडणारा मुख्य मार्ग असल्याने येथे सतत वर्दळ असते. त्यामुळे लहान मुले, नागरिक तसेच जनावरांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने विहिरीचे बांधकाम पूर्ण करावे किंवा किमान सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. “अनेक महिन्यांपासून काम बंद का आहे, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. रात्रीच्या वेळी कोणताही इशारा नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे, दरम्यान, भविष्यात येथे कोणताही अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
