पाकिस्तान हादरलं! बेछूट गोळीबारात ९ पोलिस कर्मचाऱ्यांसह १५ दहशतवादी ठार, तर ५ जवानांचे अपहरण
मुंबई,मंडे टु मंडे न्युज |पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील झियारत जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका पोलीस चौकीवर भीषण हल्ला केला आहे. या चकमकीत नऊ पोलीस कर्मचारी शहीद झाले असून ५ जवानांचे अपहरण करण्यात आले आहे. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (TTP) चे १५ दहशतवादी मारले गेले आहेत.
सोमवारी रात्री उशिरा बलुचिस्तानच्या झियारत भागातील मांगी फेज ३ येथील पोलीस चौकीला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. रात्रभर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. शहीद झालेल्या पोलिसांमध्ये दोन स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) आणि एका दहशतवादविरोधी पथकाचा (CTD) प्रभारी यांचा समावेश आहे. हल्ल्यानंतर फ्रंटियर कोअर, पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाने संयुक्त मोहीम राबवून १५ टीटीपी दहशतवाद्यांचा खात्मा केला. अपहरणात गेलेल्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात तीव्र शोधमोहीम सुरू आहे.या भीषण हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये, विशेषतः बलुचिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण असून सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांचे माहिती सल्लागार शाहिद रिद यांनी सांगितले की, मांगी भागात दहशतवाद्यांविरुद्ध राबवण्यात आलेले क्लिअरन्स ऑपरेशन पूर्ण झाले आहे. या मोहिमेत फ्रंटियर कोअर, बलुचिस्तान पोलीस, काउंटर टेररिझम डिपार्टमेंट, स्पेशल ऑपरेशन्स विंग आणि अँटी-टेररिझम फोर्स यांनी भाग घेतला होता.या कारवाईत ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (TTP) चे १५ दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांविरुद्ध इंटेलिजन्स आधारित (गुप्तचर माहितीवर आधारित) मोहिमा आणखी तीव्र केल्या जातील, असेही रिद म्हणाले.


