एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत ; दांपत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू, घटनेचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | गुरुवारी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांचा रेल्वेखाली मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे घडली.या घटनेत सुनील अमृत भिल, त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल आणि त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समोर येताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली असून, टाकरखेडा गावावर शोककळा पसरली आहे.
दांपत्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मृतांमध्ये सुनील भिल, पत्नी पार्वती, दुसरी इयत्तेत शिकणारा मुलगा सनी आणि अंगणवाडीत जाणारा चिमुकला राज यांचा समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हे कुटुंब पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडले होते. त्यानंतर रेल्वे रुळाजवळ ही दुर्घटना घडली. पहाटे सुमारे ४.४० वाजता रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
घटनेमागचे कारण अद्याप अस्पष्ट
भिल कुटुंबातील चौघांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक पातळीवर कौटुंबिक कारणांची चर्चा होत असली, तरी याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. घटनेचा तपास सुरू असून, तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.


