लग्नाच्या २० दिवसातच मृत्यूने गाठलं! नवविवाहितेच्या मृत्यूने अवघं जळगाव हळहळलं..
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढत असून सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. वाढत्या उन्हामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवत आहे.जळगाव जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, तापमानाचा पारा तब्बल ४५.६ अंशावर पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. प्रचंड उकाडा, अंगाची लाही लाही करणारे ऊन आणि उष्ण वाऱ्यामुळे उष्माघाताने बळी गेल्याच्याही घटना घडत आहेत. अशीच भयंकर घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील खामखेडा येथे उष्माघाताने २० वर्षीय नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या मोहाडी येथील २० वर्षीय नवविवाहितेचा मृत्यू झाला असून उष्मघाताने नवविवाहितेचा मृत्यू झाल्याचा संशय हा व्यक्त केला जात आहे. वैशाली सुनील मोरे (भील) असे मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. वैशाली ही पतीसोबत चोपडा तालुक्यातील खामखेड येथे नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी गेली होती.
तिथून घरी परत आल्यानंतर अचानक चक्कर येऊन कोसळल्याने व उष्मघाताचे लक्षण जाणवू लागल्याने तात्काळ वैशालीला नेरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची प्रकृती खालावल्याने जळगाव जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच नवविवाहिता वैशाली मोरे हिचा मृत्यू झाला. दरम्यान २३ एप्रिल रोजी वैशालीचा विवाह झाला होता, मात्र विवाहाच्या २० दिवसांनी वैशालीचा मृत्यू झाल्याने सासर व माहेरच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे..
