बोगस अंगणवाडी मदतनीस भरतीची चौकशी करण्याची मागणी
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | शासन आदेशानुसार नशिराबाद येथील अंगणवाड्यांमध्ये मदतनीस पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी, जळगाव कार्यालयामार्फत २०२५ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेत सात रिक्त पदे भरण्यात आली. मात्र, ही भरती शासनाच्या नियम व निकषांना डावलून तसेच चुकीच्या गुणांकनाच्या आधारे आणि बोगस कागदपत्रांच्या सहाय्याने करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत पूनम संदीप पाटील व सुवर्णा भूषण कोल्हे, नशिराबाद यांनी निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार सदर पदे सरळ सेवा पद्धतीने भरणे अपेक्षित असताना संबंधित अधिकाऱ्यांनी नियमांकडे दुर्लक्ष केले. तसेच पात्र नसलेल्या उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत पहिल्या सात क्रमांकावर दाखवून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेत बाल विकास प्रकल्प अधिकारी, जळगाव यांनी शासनाची तसेच पात्र उमेदवारांची दिशाभूल करून बोगस भरती केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर भरती शासनाच्या निकषांमध्ये बसत नसल्याने नियुक्त करण्यात आलेल्या सातही मदतनीसांची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच या प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी
अप्पर जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
