BIG BREAKING : आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची आणि तातडीची बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेणार?
नवी दिल्ली, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक बोलावली आहे. दिल्लीतील ‘सेवा तीर्थ’ येथे दुपारी ४ वाजता ही बैठक पार पडणार असून, सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्लीतच उपस्थित राहण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष, इंधनाच्या तुटवड्याच्या शक्यतेच्या , पंतप्रधान मोदींनी जनतेला घरून काम करण्याची सोय आणि ऑनलाइन वर्गांसाठी आवाहन, मंत्रिमंडळ विस्तार, ताफ्यातील वाहनांची संख्याही कमी करणे आदी पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान मोदी आपल्या परदेश दौऱ्यावरून परतताच ही बैठक होत असल्याने राजकीय वर्तुळात या बैठकीबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या बैठकीला सर्व कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
युद्ध सुरू राहिल्यास गंभीर परिणाम; येणारा काळ देशासाठी परीक्षा घेणारा : पंतप्रधान मोदी देशातील आर्थिक परिणामांवर होणार चर्चा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महत्त्वपूर्ण बैठकीत पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि त्याचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारे संभाव्य परिणाम यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती, इंधन पुरवठा साखळी आणि वाढणारी महागाई यावर सरकारचे बारीक लक्ष आहे. परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान मोदी या सर्व परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. विशेष म्हणजे, या संकटावर लक्ष ठेवण्यासाठी आणि भारताला या जागतिक मंदी किंवा विस्कळीत पुरवठा साखळीपासून वाचवण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चस्तरीय अनौपचारिक मंत्री गटाची स्थापना करण्यात आली आहे. या गटामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांचा समावेश आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या आणि फेरबदलाच्या चर्चांना उधाण
मोदी ३.० सरकारच्या पहिल्या वर्धापनदिनाला (१० जून) अवघे काही दिवस शिल्लक असतानाच ही बैठक होत असल्याने याला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. राजकीय वर्तुळात सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या आठवड्यातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ फेरबदलाबाबतच्या हालचालींना वेग आला असून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मोदी सरकारमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. या संभाव्य फेरबदलाच्या आधी सरकारचे सर्वोच्च नेतृत्व सर्व मंत्रालयांच्या कामगिरीचा आणि संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आजच्या बैठकीत या आगामी फेरबदलाचे संकेत मिळतात का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

