पळून जाऊन लग्न, त्यात भलतेच विघ्न, आई वडिलांच्या संमती शिवाय आता होणार नाही गुपचुप लग्न…
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |पळून जाऊन लग्न करताय थांबा..! तुमच्या आई वडिलांना विचारलं आहे का? प्रेमी युगुलांसाठी एक मोठी आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. आतापर्यंत अनेक तरुण-तरुणी घरच्यांचा विरोध पत्करून किंवा कोणालाही काहीही न सांगता गुपचूप लग्न उरकून मोकळे व्हायचे. मात्र, आता एका राज्य सरकारने असा काही नियम आणला आहे, ज्यामुळे पळून जाऊन लग्न करणे अवघड झाले आहे. विशेष म्हणजे, आता लग्न करण्यापूर्वी आपल्या आई-वडिलांना त्याबद्दल अधिकृतरीत्या सांगावेच लागणार आहे, अन्यथा लग्नाची कायदेशीर नोंदणी करणे कठीण होणार आहे.
गुजरात सरकारने लग्न नोंदणीच्या नियमांमध्ये अत्यंत मोठे आणि ऐतिहासिक बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.महाराष्ट्राच्या शेजारील या राज्याने घेतलेला हा निर्णय सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. गुजरात विधानसभेत मॅरेज रजिस्ट्रेशनच्या नव्या नियमांची घोषणा करण्यात आली असून, यामुळे आता गुपचूप लग्न करणाऱ्या प्रेमी युगुलांना मोठा दणका बसला आहे.
लग्नाच्या नोंदणी कायद्यात मोठे बदल
गुजरात सरकारने गुजरात मॅरेज रजिस्ट्रेशन ॲक्टच्या नियम 44 मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव अधिकृतपणे सादर केला आहे. सरकारने याला जनहिताचा मुद्दा असल्याचे म्हटले आहे.
या नव्या बदलांनुसार, कोणत्याही लग्नापूर्वी आई-वडिलांना त्याबद्दल माहिती देणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. लग्नाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करताना पालकांची माहिती देणे हा या प्रक्रियेचा मुख्य हिस्सा बनवण्यात आला आहे. या प्रस्तावित नियमांवर हरकती आणि सूचना मागवण्यासाठी सरकारने जनतेला 30 दिवसांचा वेळ दिला आहे.
अशी असेल लग्नाची नवी प्रक्रिया
नव्या नियमांनुसार, आता केवळ जोडीदाराची संमती असून चालणार नाही. लग्नासाठी अर्ज करताना कपलला एक औपचारिक घोषणापत्र द्यावे लागेल. यामध्ये त्यांनी आपल्या पालकांना लग्नाबद्दल माहिती दिली आहे की नाही, हे स्पष्ट करावे लागेल.
इतकेच नाही तर अर्जासोबत आई आणि वडील या दोघांचेही आधार कार्ड, कायमस्वरूपी पत्ता आणि मोबाईल नंबर देणे बंधनकारक असेल. असिस्टंट रजिस्ट्रार या सर्व कागदपत्रांची तपासणी करतील आणि त्यानंतर 10 कार्यालयीन दिवसांच्या आत सरकारकडून पालकांना इलेक्ट्रॉनिक किंवा प्रत्यक्ष स्वरूपात लग्नाची अधिकृत सूचना पाठवण्यात येईल.
गुजरात सरकार आता लग्नाची संपूर्ण प्रक्रिया कागदी रेकॉर्डवरून हटवून राज्य सरकारच्या सेंट्रलाईज्ड ऑनलाइन पोर्टलवर नेणार आहे. यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे लग्नाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठीचा वेटिंग पिरीयड. नव्या नियमांनुसार, लग्नासाठी अर्ज केल्यानंतर लगेच प्रमाणपत्र मिळणार नाही, तर त्यासाठी अर्ज केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांचा वेटिंग पिरीयड पूर्ण करावा लागेल.
या काळात सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाईल. या कडक नियमांमुळे गुजरातमध्ये पळून जाऊन लग्न करण्याच्या प्रकारांना आळा बसेल, असा सरकारचा विश्वास आहे.मात्र हाच नियम महाराष्ट्रात सुद्धा लागू करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्यातून केली जात आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
