“शरद पवारांनी शेवटी डाव साधला, आमची शिवसेना फोडली…”, पक्षफुटीवर रामदास कदमांचा गंभीर आरोप!
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवारांनी डाव साधला. संधी पाहून त्यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. अजित पवार यांचा प्रशासकीय अनुभव प्रचंड आहे, त्याच्या जोरावर त्यांनी देखील शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केल्याचे रामदास कदम यांनी म्हटले आहे. सेना कोसळताना पहावत नाही. आज माझे वय सत्तर वर्ष आहे. गेली 52 वर्ष मी शिवसेनेसाठी काम करत आहे हे सांगताना त्यांना आश्रू अनावर झाले.
- पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीला मांत्रिकाचा सव्वा कोटींचा गंडा ; ‘काळी जादू’च्या भीतीने ९ वर्षे उकळले पैसे
- राज्यातील सर्व शाळांसाठी दप्तर धोरण लागू : सहावी ते आठवी साठी वर्षातून दहा दिवस ‘दप्तरमुक्त’
- रावेर तालुक्यातील २२ वर्षीय विवाहित तरुणीवर अत्याचार
आमदारांच्या नाराजीची नोंद उद्धव ठाकरे यांनी घेतली असती तर ही वेळच आली नसती. पक्षातून किती जणांची हकालपट्टी करणार, असा सवाल करत कदम यांनी तुमच्या आजुबाजूला कोण आहे हे आधी पहा, असं आवाहनही केलं. एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला असताना त्यांच्याशी बोललो. पण त्यात यश आलं नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आजुबाजूच्या चौकडीला बाजूला करावं, असं कदम म्हणाले. पुढे बोलताना रामदास कदम यांनी म्हटलं आहे की, माझ वय आज सत्तर वर्ष आहे. मी गेली 52 वर्ष शिवसेनेसाठी काम करत आहे. शिवसेना वाढवण्यासाठी अनेक आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलन प्रकरणात माझ्यावर अनेक गुन्हे आहेत. मात्र तरी देखील आदित्य ठाकरे माझ्या कॅबीनमध्ये येऊन मला बैठका घेण्याचे आदेश देतात. या वयात आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावे लागते, याची खंत वाटत असल्याचे कदम यांनी म्हटले आहे. मात्र मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणल्याशिवाय शांत बसणार नाही, अखेरपर्यंत माझ्या हातात भगवाच असेल असं देखील रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांनी शिवसेना फोडली. आम्ही सांगत होतो मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचे ऐकले नाही. पवारांनी बरोबर डाव साधून शिवसेना फोडली असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. तसेच शिवसेनेतून आणखी किती जणांची हकालपट्टी करणार आहात असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान दुसरीकडे शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसतच आहेत. आमदारानंतर आता खासदारांनी देखील बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. या खासदारांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.





