लग्नानंतर अवघ्या सहा दिवसांत नवविवाहितेचा अपघाती मृत्यू ; जळगाव विद्यापीठासमोर भरधाव कारची दुचाकीला धडक
नशिराबाद,मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | जळगाव शहरात सोमवारी घडलेल्या भीषण रस्ते अपघातात लग्नानंतर अवघ्या सहा दिवसांतच एका २१ वर्षीय नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. जळगाव विद्यापीठासमोर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत वैशाली भाऊसाहेब पाटील (रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्यासोबत असलेले काका गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली पाटील यांचा विवाह ७ जुलै रोजी जळगाव येथील देवराम नगर (गुजरात पेट्रोल पंप परिसर) येथील पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी झाला होता. विवाहानंतर देवदर्शन करून हे दाम्पत्य काही दिवसांपूर्वीच घरी परतले होते.
सोमवारी वैशाली यांना माहेरी कोळपिंप्री येथे घेऊन जाण्यासाठी त्यांचे काका सासरी आले होते. दुपारी जेवणानंतर दोघे दुचाकीने माहेरच्या दिशेने निघाले. दुपारी सुमारे ४ वाजता जळगाव विद्यापीठासमोरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तर, त्यांचे काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, लग्नाला अवघे सहा दिवस झालेले असतानाच घडलेल्या या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध व घटनेचा पुढील तपास सुरू आहे.


