जगमाता परिसरातील नागरिक पाण्यासाठी हैराण; तीन महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचा बोजवारा, महिलांचा संताप; “प्रशासन जागे व्हा, अन्यथा मोर्चा अटळ!”
सावदा नगरपालिकेचा भोंगळ कारभार.
सावदा, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क |रावेर तालुक्यातील सावदा शहरातील जगमाता, रविवार पेठ परिसरात नगरपालिकेच्या निष्काळजी आणि भोंगळ कारभारामुळे नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तसेच शहरातील विविध भागातील या परिस्तीतील सामोरे जावे लागत आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना मूलभूत सुविधेसाठी अक्षरशः संघर्ष करावा लागत आहे.
वारंवार नगरपालिका कार्यालयात जाऊन तक्रारी करण्यात आल्या, संबंधित कर्मचाऱ्यांना विनंत्या करण्यात आल्या, तरीही प्रशासनाकडून केवळ पाहणी आणि आश्वासनांचा फार्स सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कर्मचारी येतात, परिस्थिती पाहतात आणि निघून जातात; मात्र प्रत्यक्षात पाण्याचा प्रश्न “जैसे थे”च असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
विशेषतः महिलांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून घरगुती वापरासाठी पाणी मिळवताना त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. एका बाजूला कडक उन्हाळा आणि दुसऱ्या बाजूला नगरपालिकेचा निष्क्रिय कारभार यामुळे जगमाता परिसरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. तसेच शहरातील बऱ्याच भागात पाण्याची समस्या भेडसावत आहे.
“कर वसुलीत पुढे असलेली नगरपालिका नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यात मात्र अपयशी ठरत आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे का?” असा संतप्त सवाल परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा संतप्त नागरिक व महिला मोठ्या संख्येने नगरपालिकेवर मोर्चा काढतील, असा इशारा देण्यात आला आहे. जगमाता परिसरातील नागरिकांचा संयम आता संपत चालला असून, प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही तर हा प्रश्न आंदोलनाच्या रूपात पेट घेण्याची चिन्हे दिसत आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
