शिक्षण आयुक्तांचे आदेश : १ मे च्या निकाला रोजी शिक्षकांनी पालकांना त्यांच्या मुलांच्या उत्तरपत्रिका दाखवाव्या
पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | २ मे पासून राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागणार आहे. त्यापूर्वी म्हणजेच १ मे रोजी इयत्ता १ ली ते ९ वी च्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. निकाला वेळी यंदा पहिल्यांदाच शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना उत्तरपत्रिका दाखवाव्या लागणार आहेत. तसे आदेश शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी काढले आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमता शोधणे, ओळखणे आणि त्या विकसीत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षक व पालकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास व अभ्यासेतर दोन्ही क्षेत्रात चालना देण्यासाठी राज्य मंडळाच्या सर्व शाळांनी निकालपत्र देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांना दाखवायच्या आहेत. शिक्षकांना आता प्रत्येक विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका अचूक तपासावी लागणार आहे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना उत्तरपत्रिका दाखविल्याने विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक समज, अनुप्रयोग क्षमता व कौशल्यांचे अचूक निदान करता येणार आहे. विद्यार्थ्याच्या अध्ययन अध्यापनाची गरज ओळखून पालकांच्या मदतीने उपाययोजना करणे शक्य होईल. तसेच वैयक्तिक पातळीवर उपारात्मक अध्ययन व गुणवत्ता संवर्धनासाठी उपक्रम राबविता येतील. गुणांपेक्षा कौशल्य व समज यावर आधारित प्रगतीचे मोजमाप शक्य होईल, हा त्यामागील उद्देश आहे.
या मुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पालक अधिक सजग व जबाबदार होतील. अध्ययनातील उणिवा लक्षात घेऊन घरी नियमित सराव, पुनरावृत्ती व मार्गदर्शन देण्याची जबाबदारी पालक पार पाडतील. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवयी (अभ्यासाची वेळ, वाचन, लेखन) विकसीत करण्यासाठी पालक सक्रिय भूमिका बजावतील. शाळा-घर या दोन्ही स्तरावर समन्वय ठेवून शैक्षणिक वातावरण निर्माण होईल. शिक्षक-पालकात सतत संवाद होईल. त्याअनुषंगाने विद्यार्थ्याच्या विकासासाठी संयुक्त कृती आराखडा तयार करता येतो, असेही शिक्षण आयुक्तांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे.
मूल्यमापन प्रक्रियेबाबत पालकांचा विश्वास दृढ होईल. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे वस्तुनिष्ठ व पारदर्शक चित्र समोर येईल. आत्मपरीक्षणातून सुधारणा करण्याची प्रेरणा मिळते आणि शैक्षणिक तसेच वर्णनात्मक प्रगतीवर पालकांचे लक्ष केंद्रीय होईल. या उद्देशानेच राज्य मंडळाच्या सर्व शाळांनी १ मे राेजी निकालावेळी पालकांना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दाखवायच्या आहेत. असे – सचिन्द्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त यांनी सांगितले.

