महाराष्ट्रसामाजिक

हिंदू नववर्ष गुढीपाडव्यालाच का साजरे केले जाते, कोणते आहेत शुभ योग

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते. हिंदू पंचांगानुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदेला, म्हणजेच वसंत ऋतुच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. यंदा हा गुढीपाडवा ९ एप्रिल २०२४ रोजी साजरा होत आहे. गुढीपाडव्याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं. या दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. ज्योतिषांच्या मते यंदाचा गुढीपाडवा अतिशय खास आहे कारण पाडव्याला अनेक शुभ योग एकाच वेळी बनत आहे. या योगांमध्ये जर तुम्ही त्रिमूर्तीची उपासना केली तर वर्षभर घरात सुख, समृ्द्धी राहील तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतील. चला तर जाणून घेऊया गुढीपाडव्याला कोणते शुभ योग तयार होत आहे.

२०२४ गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, चैत्र महिन्याची प्रतिपदा ८ एप्रिल रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुरू होणार आहे. ही प्रतिपदा दुसऱ्या दिवशी ९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी समाप्त होईल, त्यामुळे यंदा गुढीपाडव्याचा सण ९ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. ९ तारखेला सकाळी ०६.०२ ते १०.१७ मिनिटांपर्यंत गुढीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे. तुम्ही या शुभ मुहूर्तावर गुढीची पूजा करून गुढी उभारू शकता.

सर्वार्थ सिद्धी योग
गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. हा योग ९ एप्रिल सकाळी ०७ वाजून ३२ ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० एप्रिल रोजी पहाटे ०५ वाजून ०६ मिनिटापर्यंत असणार आहे. या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते. तसेच देवाकडून आशीर्वाद मिळतात .

अमृत सिद्धी योग
चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीलाही अमृत सिद्धी योग तयार होत आहे. हा योग 9 एप्रिल सकाळी ७ वाजून ३२ मिनिटे ते १० एप्रिल रोजी पहाटे ५ वाजून ६ मिनिटापर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्र अमृत आणि सर्वार्थ सिद्धी योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानते. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी पंचकची वेळ सकाळी ०६.०२ ते ०७ ३२ अशी आहे. याशिवाय गुढीपाडव्याचा संपूर्ण दिवस शुभ असून कोणतेही शुभ कार्य तुम्हाला करता येणार आहे सकाळी १०.०९ ते रात्री ०८.३० पर्यंत तुम्हला खरेदी करता येणार आहे.हिंदू नववर्ष  गुढीपाडव्याला का साजरे केले जाते,दिवशी शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.

हिंदू नववर्ष गुढीपाडव्याला का साजरे केले जाते?

हिंदु वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. वर्षारंभाचा प्रारंभदिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा हा आहे. गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या जवळपास सूर्य वसंतसंपातावर येतो आणि वसंत ऋतू चालू होतो. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात.
मात्र पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते.

आध्यात्मिक महत्त्व
ब्रह्म पुराणानुसार ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती सुरू केली. सत्ययुगाची सुरुवातही याच दिवसापासून मानली जाते.

भगवान विष्णूंनी या दिवशी मत्स्य अवतार घेतला.
चैत्र नवरात्रीलाही या दिवसापासून सुरुवात होते.
शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तो दिवस गुढीपाडवा हाच होता. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला.

या दिवशी रामाचा राज्याभिषेक झाला आणि संपूर्ण अयोध्या शहरावर विजयाची पताका फडकवण्यात आली. म्हणूनच या दिवशी संपूर्ण भारतात उत्सव असतो. नवीन किंवा शुभ कार्य केले जाते.
गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहेत. या दिवशी शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.

ऐतिहासिक महत्त्व-                                                              महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्रांच्या आदरार्थ भूमीत रोवली आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. ही परंपरा राखून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून तिची पूजा करतात. महाभारतातच खिलपर्वात कृष्ण इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा समादेश देतात. महाभारतातील आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे.

वैज्ञानिक कारण – 
चैत्र महिना हा इंग्रजी दिनदर्शिकेतील मार्च ते एप्रिल दरम्यान असतो. 21 मार्च रोजी, पृथ्वी सूर्याची एक परिक्रमा पूर्ण करते, ज्या वेळी दिवस आणि रात्र समान असतात.   

 शास्त्रज्ञ म्हणतात की या दिवसापासून पृथ्वीचे नैसर्गिक नवीन वर्ष सुरू होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून दिवस रात्रीपेक्षा मोठा होऊ लागतो. रात्रीच्या अंधारात नववर्षाचे स्वागत होत नाही. सूर्याच्या पहिल्या किरणांचे स्वागत करून नवीन वर्ष साजरे केले जाते. दिवस आणि रात्र जोडून एक दिवस पूर्ण होतो. दिवस सूर्योदयापासून सुरू होतो आणि पुढच्या सूर्योदयापर्यंत चालू राहतो. सूर्यास्त हा दिवस आणि रात्रीचा संगम मानला जातो.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!