रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; मुसळधार पावसामुळे भुसावळ–सुरत मार्गावरील सात गाड्या दोन दिवसांसाठी रद्द
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज | गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पश्चिम रेल्वे प्रशासनाने २४ आणि २५ जुलै रोजी धावणाऱ्या भुसावळ–सुरत मार्गावरील एकूण सात रेल्वेगाड्या पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, सततच्या पावसामुळे काही ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचले असून, वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही खबरदारी घेण्यात आली आहे.
२४ जुलै रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
गाडी क्र. ०९०५० भुसावळ–दादर विशेष
गाडी क्र. २०९२५ सूरत–अमरावती एक्सप्रेस
गाडी क्र. १९१०५ उधना–भुसावळ एक्सप्रेस
गाडी क्र. १९१०६ भुसावळ–उधना एक्सप्रेस
२५ जुलै रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
गाडी क्र. २०९२६ अमरावती–सूरत एक्सप्रेस
गाडी क्र. ०९०५१ दादर–भुसावळ विशेष
गाडी क्र. ०९०५२ भुसावळ–दादर विशेष
या निर्णयामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या नियोजित प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पश्चिम रेल्वेचे अभियांत्रिकी, सिग्नल आणि परिचालन विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. रेल्वे रुळ, पूल, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड विद्युत वाहिन्यांची नियमित तपासणी सुरू असून, आवश्यक त्या ठिकाणी गाड्यांच्या वेगावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. कोणताही धोका टाळून प्रवाशांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती अधिकृत रेल्वे संकेतस्थळ, मोबाईल ॲप, चौकशी सेवा किंवा संबंधित स्थानकातून तपासूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. हवामानाच्या परिस्थितीनुसार पुढील काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असून, आवश्यकतेनुसार आणखी निर्णय घेतले जाऊ शकतात, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.


