शिक्षकांची आता मूळ गावी बदली नाहीच, बदलीचा नियम बदलला, सरकारचा मोठा निर्णय
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आगामी ‘जनगणना २०२६’ साठी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. जनगणनेचं राष्ट्रीय काम सुरळीत पार पाडण्यासाठी सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या स्थगित केल्या आहेत. सर्व जिल्हा परिषदांमधील ‘गट-क’ आणि ‘गट-ड’ संवर्गातील कर्मचाऱ्यांसह शिक्षकांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे शिक्षकांचे टेन्शन वाढले आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामविकास विभागाने यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक काढले आहे. यासह सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे पत्र पाठवले आहे. दम्यान बदल्या स्थगिती करण्याच्या या निर्णयामागे केंद्र सरकारचे स्पष्ट निर्देश आहेत. केंद्रीय गृह सचिवांनी ११ मार्च २०२६ रोजी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात जनगणनेच्या कामात शिक्षक, महसूल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांची भूमिका किती ‘निर्णायक’ असते.
जनगणनेच्या मध्यकाळात जर मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या, तर या राष्ट्रीय कामात गंभीर प्रशासकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ही भीती केंद्र सरकारने व्यक्त केली होती. केंद्र सरकारने २०२६ च्या जनगणनेचे जे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १ मे ते १५ मे २०२६ दरम्यान नागरिकांना स्वतःहून माहिती भरण्यासाठी ‘स्व गणना’ कालावधी असणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ ला जनगणनेचा प्रत्यक्ष पहिला टप्पा पार पडणार आहे.
या प्रक्रियेसाठी राज्यात सुमारे २ लाख ६४ हजार प्रगणक आणि पर्यवेक्षक डिजिटल पद्धतीने घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार आहेत. राज्य सरकारने बदली स्थगित केल्यामुळे शिक्षक वर्गात नाराजीचे वातावरण आहे. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडत असते. अनेक शिक्षक आपल्या मूळ गावी किंवा सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, यंदा या प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याने लाखो कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत नियोजनावर आणि अपेक्षांवर पाणी फेरले गेलंय.

