यंदा गणपती बाप्पा १० किंवा ११ नव्हे तर थेट १२ दिवस थांबणार ; १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थी, २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी
मंडे टु मंडे न्युज | यंदाचा गणेशोत्सव तब्बल १२ दिवसांचा असणार आहे. गणेशोत्सव साधारणपणे १० किंवा ११ दिवसांचा असतो; मात्र यंदा तिथीच्या वाढीमुळे उत्सवाचा कालावधी १२ दिवसांचा होणार असल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
यंदा १४ सप्टेंबर रोजी हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत असल्याने गणेशोत्सवाला सुरुवात होईल. त्यानंतर घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाची भक्तिमय वातावरणात सुरुवात होणार आहे.
यानंतर २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने गणेश विसर्जन होईल. तिथीच्या या विशेष योगामुळे यंदा गणपती बाप्पा तब्बल १२ दिवस भक्तांच्या घरी आणि मंडळांमध्ये विराजमान राहणार आहेत.
हिंदू धर्माचे सगळे सण हे तिथी प्रमाणे साजरे केले जातात. कधी तिथीचा क्षय होतो तर कधी तिथीची वृद्धी होते. यंदा गणेश चतुर्थी ही तृतीया दिवशी येते त्यामुळे तृतीया ते अनंत चतुर्दशी असे १२ दिवस होतात. त्यामुळे यावेळेस हा उत्सव १२ दिवसांचा असणार आहे.
भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची प्राणप्रतिष्ठा घरोघरी होते आणि सार्वजनिक गणपतीचे विसर्जन हे अनंत चतुर्दशीला करण्यात येतं. चतुर्थीपासून ते चतुर्दशीपर्यंत याच्या तिथी आहेत, कारण सगळे सण-वार हे तारखेवर नसून तिथीवर अवलंबून असतात. त्यामुळे चतुर्थी ते चतुर्दशी या तिथींचा समूह हा एकूण ११ तिथींचा होतो. काही वेळेला किंचित वृद्धी होत असते आणि काही वेळेला तिथीचा क्षय होतो. त्यामुळे कधी गणपती १० दिवसांचे, कधी ११ दिवसांचे असे होत असतात.
गणेशोत्सवाचा कालावधी वाढल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सार्वजनिक गणेश मंडळांकडूनही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले जाण्याची शक्यता आहे. पंचांगानुसार तिथीच्या गणितामुळे हा बदल झाला असून, १२ दिवसांचा गणेशोत्सव हा यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

