न्यायासाठी तीन दिवस गाव बंद,भुसावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकारानंतर ग्रामस्थांचा निर्णय
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ तालुक्यातील साकरी गावात मंगळवारी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे जणू काळोख पसरला आहे. दोन अल्पवयीन मुलींच्या अकाली मृत्यूने संपूर्ण गाव हादरून गेले आहे. दरम्यान, गावाची दुःखाची जाणीव प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण गात तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दि. २७ जानेवारी रोजी सकाळी जळगाव जिल्ह्यातून मनाला सुन्न करणारी एक धक्कादायक घटना समोर आली. भुसावळ तालुक्यातील साकरी गावातील इयत्ता नववीत शिकणाऱ्या या दोन्ही मुर्लीची हत्या झाली. आणि गावातील प्रत्येक घरात शोककळा पसरली आहे. या निष्पाप जिवांच्या आठवणींना उजाळा देत आणि या अमानवी घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी ग्रामस्थांनी एक भावनिक निर्णय घेतला आहे. या निष्पाप जीवांना न्याय मिळावा व गुन्हेगारास शिक्षा व्हावी या साठी यात गुरुवारी विशेष ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
भविष्यात अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेत ‘दक्षता समिती’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती गावातील सुरक्षिततेवर लक्ष ठेवणार असून, संशयास्पद हालचालींवर वेळीच पाऊल उचलण्यासाठी सज्ज राहणार आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत दि.२९ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, मृत मुलींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संपूर्ण गाव तीन दिवस बंद ठेवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
या निर्णयानुसार गावातील सर्व शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायत कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालये तीन दिवस बंद राहणार आहेत. कोणताही उत्सव, कार्यक्रम किंवा आनंदोत्सव न साजरा करता गाव या काळात शोक पाळणार आहे. ‘ही केवळ बंदची घोषणा नाही, तर दोन मुलींवरील अन्यायाविरोधात उठलेला गावाचा आक्रोश आहे,’ अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यानh या घटने प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. या दोघा अल्पवयीन संशयितांना जळगाव येथील विधीसंघर्ष बाल न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपाधीक्षक केदार बारबोले करीत आहेत.
