“स्मार्ट मीटर नको, जुनेच मीटर हवे” आक्रमक नागरिकांनी ठोकले महावितरणच्या कार्यालयाला टाळे
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महावितरणच्या स्मार्ट मीटरमुळे जास्त रकमेची वीज देयके मिळत असल्याने संतप्त नागरिकांनी अहिल्यानगर येथील भिस्तबाग महावितरण कार्यालयात जाब विचारत कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी आक्रमक झालेल्या नागरिकांनी कार्यालयाला टाळे ठोकत जुने वीज मीटर बसवण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली भिस्तबाग परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले. यावेळी नागरिकांनी महावितरणच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. यासंदर्भात माहिती देताना शहर जिल्हाध्यक्ष बारस्कर यांनी सांगितले की, शहरात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे.
याआधी जुन्या मीटरवरून सरासरी केवळ ५०० ते १ हजार रुपयांपर्यंत वीज देयके मिळत होती. मात्र स्मार्ट मीटर बसवल्यानंतर देयकात मोठी वाढ झाली सुमारे २ ते ३ हजार रुपयांची जास्त वीज देयके येत आहेत. जोपर्यंत जुने मीटर पुन्हा बसविले जात नाहीत व वाढीव वीज देयके रद्द किंवा कमी करून दिली जात नाहीत तोपर्यंत महावितरणचे भिस्तबाग कार्यालय बंद ठेवले जाईल.
सरसकट लोकांना तीन पटीने देयके पाठविण्यात आली असून आर्थिक बोजा वाढत असून लोकांना ही देयके भरणे शक्य नाही. कुठलीही पूर्व सूचना न देता ठेकेदार जून मिटर काढून स्मार्ट मिटर बसवत आहे. अनेक तक्रारी केल्या मात्र कारवाई अद्याप झालेली नाही. स्मार्ट मिटर बसवणे बंद करावे.अशी मागणी केली. महावितरणने तातडीने तोडगा काढावा तसेच ग्राहकांनी वीज देयके भरणे थांबवावे. सर्वसामान्य नागरिक महागाईने त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत एका सामान्य कुटुंबाला महिन्याला दोन ते तीन हजार रुपयांचे वीज देयक भरणे शक्य नाही. आठ दिवसांत प्रश्न मार्गी लागला नाही तर महावितरण विरोधात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा देण्यात आला आहे..

