बिगुल वाजणार? आज होणार घोषणा? निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट….
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सगळ्यांनाच लागले आहेत. राजकीय पक्षांकडून स्थानिक पातळीवर चाचपणीस सुरुवात झाली असून ऐन हिवाळ्यात आता निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार. त्या मुळे राज्यातलं राजकारण चांगलंच तापणार आहे. राज्यातील २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषद, २९ महापालिकांच्या निवडणुका कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आता राज्य निवडणूक आयोगाने मोठी अपडेट समोर आली आहे.

आज मंगळवार रोजी संध्याकाळी ४ वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. नगरपालिकांच्या प्रभागनिहाय आरक्षणासह नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले आहे. मतदार यादीही अंतिम करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
पहिल्या टप्प्यात २८९ नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्चता आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात ३२ जिल्हा परिषदा आणि ३३१ पंचायत समित्या, तर तिसऱ्या टप्प्यात २९ महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नगरपालिकांसाठी २१ दिवसांचा, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी ३० ते ३५ दिवसांचा, तर महापालिकांसाठी २५ ते ३० दिवसांचा निवडणूक कार्यक्रम ठरवला जाण्याची शक्यता आहे. या निवडणूक कार्यक्रमात अधिसूचना प्रसिद्ध करून अर्ज भरण्यापासून ते मतदान आणि निकाल जाहीर होण्याचा कालावधीचा समावेश आहे.
मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारीपूर्वी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने तयारीचा वेग वाढवला. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, महापालिकांच्या प्रभाग आणि महापौरांच्या आरक्षणाची घोषणा या महिन्याच्या अखेरीस केली जाण्याची शक्यता आहे.


