अखेर अनिल चौधरींची निवडणुकीतून माघार, नंदकिशोर महाजन यांचा विजयाचा मार्ग मोकळा
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी ऐन मतदानाच्या तोंडावर माघार घेत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यासमोरील आव्हान वाढले आहे. जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय घडामोडी आणि चुरशीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख लढत अनिल चौधरी यांनी माघार घेतल्यामुळे आता महायुतीचे नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे शरद तायडे यांच्यात मुख्य लढत होत आहे.
या निवडणुकीत सुरुवातीला महायुतीकडून नंदकिशोर महाजन, महाविकास आघाडीकडून शरद तायडे, अपक्ष अनिल चौधरी आणि अपक्ष रेश्मा काळे असे चार उमेदवार मैदानात होते. दरम्यान, शिवसेनेच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनीही यापूर्वी आपली उमेदवारी मागे घेतल्याने निवडणूक तिरंगी झाली होती. मात्र आज आयोजित पत्रकार परिषदेत अनिल चौधरी यांनी अधिकृतपणे माघारीची घोषणा केली. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या वेळी पत्रकार परिषदेत बोलताना अनिल चौधरी यांनी सांगितले की, आमदार बच्चू कडू तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून महायुतीच्या हितासाठी उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अनिल चौधरी यांच्या माघारीनंतर आता निवडणुकीच्या रिंगणात केवळ महायुतीचे नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे शरद तायडे हे दोनच उमेदवार उरले आहेत. त्यामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली असून महाजन यांच्या विजयाच्या शक्यता अधिक सुकर झाल्याचे दिसत आहे.
जळगाव विधान परिषदेसाठी ६३० मतदार असून, ७ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून अनिल चौधरी उतरल्यानंतर महायुतीसाठी ते मोठे आव्हान मानले जात होते, परंतु वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी अर्ज मागे घेतला नसला तरी अखेरच्या क्षणी नंदू महाजन यांना पाठिंबा दिला. त्या मुळे महायुतीचे नंदकिशोर महाजन यांची निवडून येण्याची शक्यता अधिक बळावली आहे.


