डॉक्टरांच्या राज्यव्यापी संपामुळे आपत्कालीन सेवाही ठप्प; रुग्णांचे प्रचंड हाल
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये बीएचएमएस-सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या निर्णयाविरोधात निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे.कालपासून सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा न निघाल्याने ते अधिक तीव्र झाले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) आवाहनानुसार खासगी डॉक्टरांनीही ओपीडी बंद ठेवून केवळ आपत्कालीन सेवा सुरू ठेवल्या आहेत.
महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी बुधवारपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला असून, गुरुवारी पहाटे ६ वाजल्यापासून आपत्कालीन (इमर्जन्सी) सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) यांच्या आवाहनाला राज्यभरातील दोन लाखांहून अधिक ॲलोपॅथिक डॉक्टरांचा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आरोग्यसेवेवर मोठा परिणाम झाला असून रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जळगाव जिल्ह्यात रुग्णांचे हाल
राज्यव्यापी संपाचा परिणाम जळगाव जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. खाजगी रुग्णालये, दवाखाने आणि ओपीडी सेवा बंद राहिल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांची मोठी गैरसोय झाली. नियमित तपासण्या, वैद्यकीय सल्लामसलत आणि नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्याने अनेक रुग्णांना ताटकळत परतावे लागले.
सरकारी रुग्णालयांवर वाढला ताण
खाजगी आरोग्यसेवा बंद असल्याने रुग्णांचा मोठा ओघ सरकारी रुग्णालयांकडे वळला. परिणामी जिल्हा रुग्णालयांसह सरकारी दवाखान्यांमध्ये दिवसभर मोठी गर्दी दिसून आली. अतिरिक्त ताण असूनही डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा सुरू ठेवत रुग्णांना शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न केला
या आंदोलनामागील प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (MMC) ३० जून रोजी जारी केलेली अधिसूचना. या अधिसूचनेनुसार, सहा महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी (CCMP) पूर्ण केलेल्या बीएचएमएस (होमिओपॅथी) डॉक्टरांना आधुनिक (ॲलोपॅथिक) औषधे लिहून देण्याची तसेच एमएमसीकडे नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या निर्णयाला ॲलोपॅथिक डॉक्टरांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. एका वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना पूर्ण वैद्यकीय प्रशिक्षणाशिवाय दुसऱ्या शाखेची उपचारपद्धती वापरण्याची परवानगी देणे रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक असल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच यामुळे वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा घसरेल आणि नियामक व्यवस्थेवरही परिणाम होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मुंबईतील केईएम, सायन, नायर आणि जे.जे. रुग्णालयांसह राज्यातील अनेक शासकीय व खाजगी रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे उपचार, तपासण्या आणि नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या असून हजारो रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.


